केशरी रेशनकार्ड धारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जुन मध्येही होणार पुन्हा वाटप

केशरी रेशनकार्ड धारकांना अन्नधान्यांचे सवलतीच्या दरात जुन मध्येही होणार पुन्हा वाटप

मुंबई | प्रतिनिधी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण राज्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करतानाच राज्य सरकारने अन्न धान्य मोफत वाटण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

मागच्या लॅाकडाऊनच्या काळात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तसेच शेतकरी योजनेअंतर्गत सामाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात आला होता.

या योजनेअंतर्गत पुन्हा जुनमध्ये अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

भुजबळ म्हणाले की, राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत अन्नधान्यांचे राज्यात मोफत वितरण चालू आहे. त्याचबरोबर आता एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांनाही जुन महिन्यात प्रतिव्यक्ती १ किलो गहू व १ किलो तांदूळ याप्रमाणे २ किलो अन्नधान्य सवलतीच्या दरात वाटप करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या निर्णयाचा राज्यातील ७१ लाख ५४ हजार ७३८ एपीएल केशरी शिधापत्रिकाधारकांना लाभ होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com