
मुंबई | Mumbai
राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) कोसळल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) संकटात सापडला असून सरकारकडे भरपाईची मागणी करत आहेत. तसेच विरोधकांनी देखील सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करून तातडीने भरपाई द्यावी अशी मागणी लावून धरली.
तर दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे नुकसान झाले तरी कृषीमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर देखील गेले नाही असे म्हणत विरोधकांनी विधानसभेत (Legislative Assembly) मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर कालपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नुकसानग्रस्त शेतीचे पाहणी करत असून त्यांनी काल (दि.२१) रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) भागात पाहणी केली.
कृषीमंत्री येणार म्हणून शेतकऱ्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. परंतु, दुपारी येणारे कृषीमंत्री रात्री पोहोचले. त्यानंतर त्यांनी कुंभारी गावात एका द्राक्ष बागेची पाहाणी केली. मात्र, या पाहणी दौऱ्यानंतर सत्तार यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी निशाणा साधला आहे.
यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "आपण भाग्यवान आहोत की, रात्रीचं दिसणारा माणूस हा महाराष्ट्राचा कृषीमंत्री आहे. दिवसा नाही दिसलं तरी चालेल, कारण रात्रच महत्त्वाची असते. हास्यास्पद आहे हे सगळं. अजून हे नेते शेतकऱ्यांचा बांधावर गेले नाहीत. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे झालेले नाहीत. शेतकऱ्यांन एक रुपया देखील मिळालेला नाही. शेतकऱ्यांना कोणी विचारत नाही. "असे त्यांनी म्हटले.