
नाशिक | Nashik
ठाकरे गटाच्या (Thackeray Group) नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केल्याने नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले होते. त्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) दोन वेळा नाशिक दौऱ्यावर आले होते. मात्र तरी देखील ठाकरे गटाला डॅमेज कंट्रोल रोखण्यात सातत्याने अपयश येत आहे.
त्यानंतर आज ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) हे शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असतांना नाशकात पुन्हा एकदा ठाकरे गटाला भगदाड पडले आहे. यानंतर शिवसंवाद यात्रेच्या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी सिन्नरमधील माळेगावातील एका कार्यक्रमात शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा आव्हान दिलं आहे.
यावेळी ठाकरे म्हणाले की, 'मी परवा म्हटलं की, राजीनामा (Resignation) द्या आणि वरळीत लढवून दाखवा. चला मी राजीनामा देईन. वरळीत काय ठाण्यात देखील लढेन, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पुन्हा एकदा आव्हान देत डिवचले आहे.
पुढे ते म्हणाले की, मी समोरून आव्हान दिले असताना सोशल मीडियावर (Social Media)आयटी सेलकडून मला टार्गेट केलं जात आहे. सगळे गद्दार माझ्या अंगावर येत आहेत. पण माझे शिवसैनिक सांभाळून घेत आहेत. माझ्या मागे कोणती महाशक्ती नसून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले की, मी ज्या पद्धतीने नागरिकांशी संवाद (Dialogue) साधत आहे, तसा संवाद ते साधतील का? ५० खोके आणि एकदम ओके एवढंच सुरू असून एक रुपयांची मदत देखील शेतकऱ्यांना (Farmers) अजून मिळालेली नसल्याचे ठाकरेंनी म्हटले.