
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सरकारने ३० दिवसांचा वेळ मागितला होता. यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला (Government) ४० दिवसांचा वेळ दिला होता. हा वेळ काल (मंगळवार) संपला असून आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी मंत्री गिरीश महाजन यांनी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे...
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) फोनवरून संवाद साधताना जरांगे पाटील यांना म्हणाले की, "तुमच्या तीन चार मागण्या आज पूर्ण करतो. आपल्याला सर्वोच्च न्यायालयात टीकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे शिंदे समितीला वेळ लागत आहे. आम्हाला आणखी वेळ द्यावा. तसेच समितीचा अभ्यास सुरू असून आरक्षण लवकरच मिळेल, काहीतरी सकारात्मक होईल, साखळी ठेवा मात्र आमरण उपोषण नका करू", अशी विनवणी महाजन यांच्याकडून जरांगेंना करण्यात आली.
तर मंत्री गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर देतांना जरांगे पाटील म्हणाले की, समितीचा अभ्यास ४० वर्षांपासून सुरूच आहे. मराठा आंदोलकांवरील खटले दोन दिवसात मागे घेतो, ते अजून मागे घेतलेले नाहीत. तसेच आरक्षण न्यायालयात (Court) टिकाव म्हणून मी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला होता. मात्र मी आता थांबणार नाही. आता मी उपोषणाला बसणार आहे. शिंदे समितीने गेल्या एका महिन्यात काहीच काम केले नाही. आंदोलकांवरील गुन्हे देखील अजून मागे घेतले नाहीत. समितीने १५ दिवस झाले तरी काहीच काम केले नाही, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.