
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे (Revolutionary Raghoji Bhangre) हे आदिवासी बांधवांसह सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. नाशिक जिल्ह्याच्या (Nashik District) इगतपुरी तालुक्यात (Igatpuri Taluka) वासाळी (Wasali) येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींची मागणी आहे. या मागणीचा विचार करून आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक प्रेरणास्थान तसेच आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावा. यासंदर्भातील कामे गतीने पूर्ण करावीत, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी आयोजित बैठकीत दिली...
अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवार (दि.२१) रोजी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे स्मारक (Memorial ) उभारण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाची जागा इगतपुरी आणि कळसूबाई शिखर परिसराला लागून आहे. स्मारकापासून कळसूबाई शिखरापर्यंत (Kalsubai Peak) रोप-वे च्या कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतून निधी मिळणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच स्मारकाबरोबर आजूबाजूचा परिसर पर्यटनस्थळ (Tourist Spot) म्हणून विकसित केल्यास परिसरातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होवू शकतो. यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वापरून या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही पवार यांनी यावेळी सांगितले. याशिवाय सिद्धेश्वर धरण परिसराचे सुशोभीकरण आणि विकास वृंदावन बागेच्या धर्तीवर करण्यासाठी जलसंपदा विभाग प्रयत्न करीत आहे. पर्यटन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेऊन पुढील निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही अजित पवार यांनी बैठकीत स्पष्ट केले.
दरम्यान, या बैठकीला आमदार सुनील शेळके, चंद्रकांत नवघरे, माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील यांच्यासह पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नाशिकचे जिल्हाधिकारी आदी मान्यवर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.