
मुंबई | Mumbai
राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच पेटला असून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने, उपोषण सुरु केली आहेत. तसेच राज्यभरात मराठा आंदोलकांनी (Maratha Agitators) राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली असून अनेक पक्षातील कार्यकर्ते आणि नेते यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. तर काही ठिकाणी मराठा आंदोलकांनी आमदारांचे घर, गाड्या जाळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे...
आज सकाळी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव (Majalgaon) येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांनी दगडफेक करत वाहनांची आणि बंगल्याची तोडफोड करून जाळपोळ केली होती. त्यानंतर आता पुन्हा बीडमध्ये राष्ट्रवादीच्या आणखी एका आमदाराचे घर मराठा आंदोलकांनी जाळल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar) यांचे घर मराठा आंदोलकांनी पेटवलं आहे. तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय देखील मराठा आंदोलकांनी पेटवल्याची माहिती समोर आली असून बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच मराठा आंदोलकांच्या जमावाने क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजचे कार्यालय देखील पेटवलं आहे.
दरम्यान, मराठा आंदोलकांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय (NCP Office) देखील पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांच्या कार्यालय यांची जाळपोळ केल्याचे बोलले जात आहे. तर मंत्री छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते सुभाष राऊत यांचे बीडमधील हॉटेल सुद्धा पेटवून देण्यात आलेले आहे. त्यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसत आहे.