Maratha Reservation : "शिंदे-फडणवीसांनी दिल्लीतून निर्णय घेऊन यावा नाहीतर..."; मनोज जरांगे पाटलांचा इशारा
मुंबई | Mumbai
मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी आजपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी सरकारने त्यांच्याकडे ३० दिवसांचा वेळ मागितला होता. यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला (Government) ४० दिवसांचा वेळ दिला होता. हा वेळ काल (मंगळवार) संपला. त्यानंतर आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटीलांनी उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केली आहे....
मनोज जरांगे पाटीलांच्या आंदोलनाची देखील राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून आज सकाळी मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी सरकारच्या वतीने मध्यस्थी करत फोनवरून जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत "तुमच्या तीन चार मागण्या आज पूर्ण करतो. आपल्याला सर्वोच्च न्यायालयात टीकणारे आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे शिंदे समितीला वेळ लागत आहे. आम्हाला आणखी वेळ द्यावा. तसेच समितीचा अभ्यास सुरू असून आरक्षण लवकरच मिळेल, काहीतरी सकारात्मक होईल, साखळी ठेवा मात्र आमरण उपोषण नका करू",असे म्हटले होते. त्यावर जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेणार नसल्याचे म्हटले होते.
त्यानंतर आज सायंकाळच्या सुमारास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुंबई विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाले. या दोघांच्याही दिल्ली दौऱ्याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या दौऱ्याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. अशातच आता शिंदे-फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, शिंदे आणि फडणवीसांनी आता दिल्लीतून निर्णय घेऊनच राज्यात यावं. त्यानंतर एक तासही दिला जाणार नाही. समाज तुमच्या निर्णयाची वाट पाहात आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले तर तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू. आरक्षणाची आम्हाला गरज आहे, कारण आमच्या लेकरांचे आयुष्य उद्धवस्त होत आहे. आता आम्ही माघार घेणार नाही. समाज मालक आहे. समाजच निर्णय घेईल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींशी चर्चा करा आणि आरक्षण द्या. मोदी यांना गोरगरिब जनतेची जाण आहे. काहीतरी शिजतंय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. मग, त्यांना आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय, असा सवालही जरांगे पाटील यांनी केला आहे.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) एक फोन आणि मराठ्यांना आरक्षण देऊन टाका असे सांगितले तर लगेच मराठ्यांना आरक्षण मिळेल. नरेंद्र मोदींचा फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना फोन आला, तर मराठा आरक्षणाची घोषणा होईल आणि सर्वत्र ब्रेकिंग न्यूज येतील. पण गोरगरीबांवर लक्ष द्यायला, त्यांच्याकडे वेळ आहे की नाही? यावर शंका आहे, असेही जरांगे यांनी म्हटले.