
मुंबई | Mumbai
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation ) मुद्दा चांगलाच पेटला असून ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून उपोषण, आंदोलने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांचे (Manoj Jarange Patil) बेमुदत उपोषण सुरु असून आज (०२ नोव्हेंबर) रोजी त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. अशातच आज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली आहे....
यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांचा आणि माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही. आम्ही अटकेपार झेंडे लावणारे मावळे आहोत. आम्ही जर मनावर घेतले तर यांचा (देवेंद्र फडणवीस) आवाज (Voice) पाच मिनिटात बंद होईल, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडू न देता मराठा समाजाला (Maratha Community) आरक्षण द्या असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, सरकार महाराष्ट्रातील (Maharashtra) मराठा समाजाला आरक्षण किती दिवसात देणार? कसं देणार? किती दिवसांत देणार?, तुमच्या अडचणी काय आहेत? हे एकदा सरकारने सांगावे. आमची दिशाभूल करण्यासाठी हे चाललंय का? एकदा तुम्ही चर्चेला या. आम्हाला जर वाटले की मुदत द्यायची आहे तर देऊ. वेळकाढू पणा करत आहेत असे वाटले तर आम्ही वेळ देणार नाही. मुदत दिली तरीही आंदोलन मागे घेणार नाही असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच मराठा समाज कुणालाही त्रास देणार नाही चर्चेसाठी या असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पुढे म्हणाले की, सरकारमधला एक उपमुख्यमंत्री (DCM) तर कलाकार आहे त्याच्याकडे बघावं लागलं. बाळा तू लोकांना थांबव, उगाच परिस्थिती बिघडू देऊ नको. एक तर याने सगळा भाजप (BJP) विद्रुप करुन टाकला. रंगीबेरंगी पक्षात आणि सरकारमध्ये आणून ठेवलेत. आम्ही तुमचा आदर करत होतो काल परवापर्यंत. पण तुम्ही काड्या करायला लागले. तुम्ही समाजाबाबत व्यवस्थित निर्णय घ्या. तुमचा रुलच आहे पहिल्यापासून लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय तुमचं जमतच नाही. असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.