
मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात सध्या चांगलाच तापला असून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण (Hunger Strike) सुरु केले आहे. आज (३१ ऑक्टोबर) रोजी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. त्यातच कालपासून मराठा आरक्षणाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत असून अनेक भागात मराठा आंदोलकांनी नेत्यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी फोनवरून मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केली. यावेळी जवळपास अर्धा तास दोघांमध्ये चर्चा झाली. यात कुणब प्रमाणपत्र, विशेष अधिवेशन अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले गेले. त्यानंतर जालन्यातील (Jalna) आंदोलनस्थळावरून मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी मुख्यमंत्री शिंदेंना स्पष्टपणे सांगितले की नोंदीनुसार अहवाल स्वीकारणार नसून अर्धवट आरक्षण घेणार नाही. तसेच आम्ही मराठा अभ्यासकांची बैठक बोलावली आहे. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा २००४ चा जीआर दुरुस्त करा. शेतीच्या आधारावरच आरक्षण दिलेले आहे. कितीही बहाणे सांगितले तरी आम्ही ऐकणार नाहीत. समितीकडे भरपूर पुरावे आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे. ६०-६५ टक्के मराठा समाज अगोदरच ओबीसीमध्ये (OBC) आहे, आम्ही थोडे राहिलेलो आहोत. विशेष अधिवेशन घ्या, ज्याचा कुणबी प्रमाणपत्राला विरोध आहे त्यांनी घेऊ नका. शेतीची लाज वाटण्याएवढे मराठे खालच्या पातळीवर नाहीत, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, कालपासून मी पाणी (Water) पितोय, मी पाणी पिल्यानंतर समाज शांत होणार असेल तर मी पाणी पिणार. मी पुन्हा सांगतो उद्रेक करू नका, आत्महत्या करू नका. खांद्याला खांदा लावून लढा, पाण्यामुळे तब्येत चांगली झाली असून उठून बसलो आहे. सगळीकडे शांततेत उपोषण सुरू असून आमरण उपोषण जसे सहन होईल तसे करा, मात्र साखळी उपोषण सुरू ठेवा, असे आवाहन यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले.
तसेच राज्यात आमदार-खासदारांच्या (MLA and MP) सुरू असलेल्या राजीनामा सत्रावर बोलतांना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सर्वांनी मुंबईत जाऊन आवाज उठवा असे म्हटले होते. बहुतेक आमदार मुंबईकडे (Mumbai) गेले. मात्र, राजीनामा देण्याचे कळत नाही. सर्व आमदार खासदार मुंबईतच रहा, राजीनामा दिल्याने काय फायदा होतो कळत नाही पण सर्वांनी मुंबई सोडायची नाही. असे त्यांनी म्हटले. याशिवाय राज्यात काही ठिकाणी मराठा आंदोलनाला लागलेल्या हिसंक वळणावर बोलतांना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने संयम राखावा, थोडं टप्प्याटप्प्यात होऊ द्या, बंदचा विचार तूर्तास करू नये, असे त्यांनी यावेळी सांगितले.