
मुंबई | Mumbai
सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या महिन्याभरापासून सुनावणी चालू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, बऱ्याच महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या महापालिका निवडणुकाही (Municipal Elections) लवकरच लागण्याची शक्यता वर्तवली जात असून त्यावरूनही राजकीय दावे-प्रतिदावे केले जात आहेत...
या पार्श्वभूमीवर अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहू लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आधीपासून तयारी सुरू केलेली असताना आता मविआच्या जागावाटपाबाबत जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातच काल मुंबईत मविआची बैठक पार पडली. त्या बैठकीत मविआ लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असून त्यांच्यात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे.
त्यानुसार महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गट २१, राष्ट्रवादी १९ आणि काँग्रेस ०८ जागा लढवणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे यामधील मुंबईतील ०६ लोकसभा जागांपैकी ०४ जागा ठाकरे गट तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १-१ जागा लढवणार असल्याचे सांगितले जाते. तसेच राज्यातील ४८ पैकी ५ ते ६ जागा अशा आहे ज्यावर मविआमध्ये (Mahavikas Aaghadi) पूर्ण सहमती झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मविआमध्ये लोकसभेच्या जागावाटपाबाबत एकमत होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (BJP and ShivSena) या दोन्ही पक्षांची युती होती. त्यावेळी दोघांनी महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. यात भाजपचे २३ तर शिवसेनेचे १८ जागांवर उमेदवार निवडून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि काँग्रेस व एमआयएमला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला होता.