मुंबई | Mumbai
महाराष्ट्राने (Maharashtra) प्रजासत्ताक दिनाला (Republic Day) कर्तव्यपथावरील संचलनामध्ये साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा चित्ररथ सादर केला होता. यात साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर,तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश होता. त्यानंतर आता या चित्ररथाला राजपथावरील (Rajpath) संचलनात दुसरा क्रमांक मिळाला आहे.
यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या समोर तुळजाभवानीचे गोंधळी दाखविण्यात आले होते. तर त्यांच्या पाठीमागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच, कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा दाखविण्यात आला होता. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन कर्तव्यपथावर पाहायला मिळाले होते.
दरम्यान, यावर्षी कर्तव्यपथावरील संचलनामध्ये (Circulation) १७ राज्यांच्या चित्ररथांचा समावेश होता. त्यापैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा तर उत्तराखंडच्या (Uttarakhand) चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला आहे. तसेच मागील वर्षी सर्वोत्तम चित्ररथ असलेल्या उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) चित्ररथाला यंदा तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.