मुंबईः
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (monsoon session) आजपासून सुरु झाले. सकाळी अधिवेशनला सुरुवात होताच प्रश्नोत्तरे, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आक्रमक झाले.
सभागृहात देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी (mpsc) परीक्षेचा मुद्दा उपस्थित केला. देवेंद्र फडणवीसांनी (devendra fadnavis) विधीमंडळात स्वप्निल लोणकरची (swapnil lonkar) सुसाईड नोट वाचली. 430 विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे, हा मुद्द उपस्थित करत एसपीएससीच्या कारभारावर टीका केली. सुधीर मनगंटीवर यांंनी स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
विरोधक आक्रमक झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या जागा भरणार असल्याचे जाहीर केले.
स्वप्निल लोणकर (swapnil lonkar)या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्यानं स्वप्निलने आत्महत्या केली.एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अधिवेशनाचे कामकाज दोन दिवसाचे असणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनापूर्वी शासनाकडून प्रस्तावित विधेयकांची आणि अध्यादेशांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या सर्व विधेयक आणि अध्यादेशांवर दोन दिवसीय अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे. राज्याचा नवा कृषी कायदा व दोन शक्ती विधेयके मांडली जाणार आहेत.
एमपीएससी’चा कारभार गतिमान होऊन उमेदवारांना न्याय मिळण्यासाठी ‘एमपीएससी’ सदस्यांच्या सर्व जागा 31 जुलै 2021 अखेरपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली.
‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीच्या विलंबामुळे नियुक्ती होत नसल्याने स्वप्नील लोणकर या पुण्यातील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक असून सरकारने हा विषय गांभीर्याने घेतला आहे. भविष्यात अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सक्षम व्यवस्था निर्माण केली जाईल. लोणकर कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखतीला विलंब झाल्याने आलेल्या नैराश्यातून पुण्यातील स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला होता. त्या चर्चेला उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, लोणकर कुटुंबियांवर ओढवलेले दु:ख मोठे असून, राज्य सरकार लोणकर कुटुंबियांच्या दु:खात सामील आहे. लोणकर कुटुंबियांना मदत देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल. नियुक्तीला झालेला विलंब हा न्यायालयाने वेळोवेळी दिलेले निर्णय आणि कोरोना महामारीची परिस्थितीमुळे झाल्याचे सांगून कुठल्याही विद्यार्थ्यांने नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नात स्वत: लक्ष घालत असून एमपीएससीच्या परीक्षार्थींच्या अडचणी दूर करण्यासंदर्भात ‘एमपीएससी’चे अध्यक्ष आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन भरतीप्रक्रिया गतिमान करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलिस आदी महत्वाच्या विभागांमध्ये सर्व पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरु असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली.