मुख्यमंत्री कार्यालयाचे टि्वट अन् लॉकडाऊन वाढण्याची चर्चा
मुंबई:
राज्यात कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी १४ एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाला. तो १ मेपर्यंत होता. त्यानंतर तो वाढवून १५ मे केला. त्यानंतर रुग्णसंख्या कमी झाली नसल्याने १ जूनपर्यंत वाढवण्यात आला. आता १ जूनच्या पुढेही महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता वाटत आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने शुक्रवारी एक ट्विट केले आहे. त्या टि्वट अन् लॉकडाऊन वाढण्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून आज दुपारी एक टि्वट केले. त्यात म्हटले की, १४ जून २०२१ पर्यंत महाराष्ट्रात शिवभोजन थाळी मोफत मिळणार आहे. म्हणजेच शिवभोजन थाळी आणखी १५ दिवस मोफत देण्याचा जो निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ते लक्षात घेता लॉकडाऊनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात अजित पवार लॉकडाऊनवर म्हणाले...
पुण्यात माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार लॉकडाऊनवर म्हणाले, ‘आज २१ मे आहे, १ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत आपण लॉकडाऊन कायम ठेवला आहे. लॉकडाऊन केल्याचे चांगले परिणाम पुणे जिल्ह्यासह दिसत आहेत. त्यामुळे पुढे काय करायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. योग्य वेळी त्यासंबंधीचा निर्णय घेतला जाईल. आणखी दहा दिवस आपल्या हातात आहेत. त्यानंतर काय निर्णय करायचा ते पाहू.