
मुंबई | Mumbai
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला. खारघरमध्ये (Kharghar) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भर दुपारी हा कार्यक्रम झाल्यामुळे उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याने आतापर्यंत त्यात १४ श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे...
या दुर्घटनेनंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर (State Government) टीका केली जात आहे. त्यातच आता राज्य सरकारने भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी मोकळ्या परिसरात शासकीय कार्यक्रमाच्या वेळेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री मगलप्रभात लोढा (Mangalprbhat Lodha) यांनी माध्यमांना याची माहिती दिली आहे.
राज्य सरकारच्या निर्णयाबाबत माहिती देतांना मंत्री लोढा यांनी सांगितले की, 'खारघरची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या घटनेची कल्पनाही कुणी केली नव्हती. त्या दिवशी जे काही झालं, त्याची पुनरावृत्ती कुठेही होऊ नये, कुणाला त्रास होऊ नये म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे. जोपर्यंत उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी १२ ते ५ वाजेच्या दरम्यान खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही. हा चांगला निर्णय आहे. सर्व लोकांनी (People) याचे पालन करायला पाहिजे' असे त्यांनी म्हटले.
राज्य सरकारने काय घेतला निर्णय?
भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारच्या वेळी असे कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.