मुंबई
लॉकडाऊन काळात आलेल्या वीज बिलावरुन राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. त्यानंतर आता राज्य सरकार वीज ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. वीज बिलात ग्राहकांना सूट मिळणार आहे. सरकारकडून त्याबाबतचा प्रस्तावही तयार आहे.
राज्य सरकार मागील वर्षी वापरलेल्या वीज वापरातील तफावत पूर्णपणे भरणार आहे. म्हणजेच गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही ६० युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी १०० युनिट वीज वापराचे बिल आले आहे. तर तुम्हाला केवळ ६० युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या ४० युनिटचे बिल सरकार भरणार आहे.
विजेचा वापर १०१ ते ३०० युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराच्या ५० टक्के रक्कम सरकार भरणार आहे. वीज वापर ३०१ ते ५०० युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा २५ टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. लॉकडाऊन काळात ज्यांनी वीज बिल भरलेले असेल, त्या ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे.