मुंबई l Mumbai
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022) आजपासून सुरू होत आहे. करोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाल्याने दोन वर्षांनंतर तीन आठवड्यांचे अधिवेशन होत आहे. या आधीच्या अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशनही वादळीच ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावेळीच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली.
सत्ताधाऱ्यांच्या या गदारोळामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपलं अभिभाषण थांबवलं आणि सभागृहातून निघून गेले.
काय म्हणाले होते राज्यपाल?
महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले होते.