Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामुंबईत आमदारांसाठी आलिशान घरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईत आमदारांसाठी आलिशान घरे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुंबई महानगर ( Mumbai ) प्रदेश वगळता राज्यभरातील आमदारांना मुंबईत गोरेगाव येथे 300 घरे उपलब्ध करून देण्यात येणार ( houses for MLAs in Goregaon) असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी गुरुवारी विधानसभेत केली. सभागृहात राज्याचे विषय मांडणार्‍या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचे चांगले संबंध असले पाहिजेत म्हणून त्यांना कायमस्वरुपी घरे देणार असल्याचा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

- Advertisement -

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे केवळ बोलणारे नाही. पण जे बोलतो ते करून दाखवणारे सरकार आहे. मुंबईकरांच्या हताच्या ज्या गोष्टी आहेत, त्या करून दाखविल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असेही ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले. मुंबईतील इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्विकास तसेच म्हाडाच्या संदर्भात विधानसभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती सभागृहाला दिली.

म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांसाठी असलेल्या अडचणी दूर करून देशात उत्तम उदाहरण निर्माण करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे. झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला चालना देण्यासाठी योजना आखण्यात आल्या आहेत. म्हाडाच्या इमारतींचे सेवाशुल्क आणि उपनगरातील इमारतींना अकृषीक करातून सूट देण्यात येत असून रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हे सरकार अभय योजना जाहीर करत आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

आपल्या उत्तरात ठाकरे यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या योजनांबाबत तिन्ही मंत्र्यांचे अभिनंदन केले.

नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, सफाई कामगारांसाठी घरे

गोरेगावातील पत्राचाळीचा वाद सोडवला आहे. बीडीडी चाळीचा रखडलेला प्रकल्प सुरू झाला आहे. नोकरदार आणि शिक्षणासाठी आलेल्या महिलांसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहेत. सफाई कामगारांचे आयुष्य फार वाईट असते. ते काम करतात म्हणून आपण सुखाने राहू शकतो. त्यांना निदान सुखाने राहण्यासाठी घर देऊ शकतो याचा विचार धोरणात केला आहे. ग्रामीण भागातील लोकांना ज्याप्रमाणे घरे देत आहोत, शहरात राहणार्‍या आणि कष्ट करणार्‍या लोकांनाही आपण घरे देत आहोत. निवडणुकीवेळी घोषणा करतो आणि विसरून जातो. मग सांगतो की ते निवडणुकीपुरते होते, पण असे सांगणारे महाविकास आघाडी सरकार नाही, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

मुंबईकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून बघितले जाते. जो तो अंडी नेतो, पण या कोंबडीची निगा राखणार कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मुंबईकर, गिरणी कामगार, कष्टकरी जनता यांनी घाम गाळला, रक्त सांडले. त्यातून ही मुंबई मिळाली, पण त्यांचा विचार आजपर्यंत कोणीच केला नव्हता. तो विचार कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात आणणारे हे सरकार आहे.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री (Chief Minister Uddhav Thackeray)

- Advertisment -

ताज्या बातम्या