मुंबई
राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊन त्यापुढेही वाढवला जाणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केले होते. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढणार की काही दिलासा मिळणार? हा प्रश्न सध्या चर्चेला जात आहे.
सध्या राज्यात कठोर निर्बंध लागू आहेत. दुकानं केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू ठेवण्याची मुभा आहे. याचा परिणाम अनेक ठिकाणी दिसून आला आहे. नाशिकसह पुणे, मुंबई नागपूरमधील रुग्णसंख्या कमी झाली आहे. तसेच राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लाटेचा मुकाबला कसा करायचा, याची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण संकेत दिले. ते म्हणाले '१ जूनपासून निर्बंध टप्प्याटप्प्यानं शिथिल केले जातील. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असलेल्या जिल्ह्यांमधील निर्बंध हळूहळू मागे घेतले जातील'.
कोकण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री म्हणाले होते, ‘कोरोना कमी होतोय हे नक्कीच. पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्यावेळी आपण अनुभव घेतलाय. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण, थोडीशी शिथिलता आली अन् कोविड चौपटीने वाढला',