दिल्ली | Delhi
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे दिलासादायक चित्र दिसत आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ८० हजार ८३४ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ३०३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ इतकी झाली आहे.
तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ७० हजार ३८४ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात १ लाख ३२ हजार ०६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ८० लाख ४३ हजार ४४६ वर पोहचली आहे.
देशातील सध्याच्या दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट ४.२५% इतका आहे. लागोपाठ २० व्या दिवशी देशाचा पॉझिटिव्हिटी रेट १० टक्केंपेक्षा कमी आहे. देशाचा रिकव्हरी रेटही वाढत आहे. शनिवारी देशातील रिकव्हरी रेट ९५.२६ टक्के इतका झाला आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
देशासह महाराष्ट्रात देखील करोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. काल राज्यात १४ हजार ९१० जण कोरोनामुक्त झाले आहेत तर १० हजार ६९७ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच ३६० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.