Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याचार महिन्यांपासून किसान रेल्वे बंद

चार महिन्यांपासून किसान रेल्वे बंद

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ( PM Narendra Modi ) ड्रीम प्रोजेक्ट असलेली, देशातील लाखो शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती घडविणारी, रेल्वेला रोज कोट्यवधीचा नफा देणारी किसान ट्रेन ( Kissan Train) 13 एप्रिल 2022 पासून देशभरात बंद आहे.

- Advertisement -

वेदनेची गोष्ट अशी की, कोळसा टंचाई संपली तरीही कोळशाच्या मालगाड्यांसाठी किसान ट्रेन गुंडाळल्याने शेतीमालाचे रोज हजारो टन नुकसान होत आहे. त्यातच गाडी बंद असताना सरकारने शेतकर्‍यांना पुन्हा 50 टक्के अनुदान जाहीर करून थट्टा केली आहे. ही रेल्वे बंद झाल्याने एकट्या देवळाली ते बिहार या मार्गावर 30 हजार बेरोजगार झाले आहेत. रेल बोर्डाने ही गाडी बंद ठेवल्याच्या वृत्ताला भुसावळचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसुपरे यांनी दुजोरा दिला आहे.

मध्य रेल्वेने 7 ऑगस्ट 2020 रोजी देवळाली ते दानापूर ही पहिली किसान ट्रेन सुरु केली. पंतप्रधानांनी तीला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीने जानेवारी 2022 पर्यंत एकट्या मध्य रेल्वेवर एक हजार फेर्‍या पूर्ण केल्या. त्यातून सुमारे चार लाख टन शेतीमाल देशभरात पोहोचला. तर रेल्वेला 260 कोटी भाडे मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ 156.47 टक्के जास्त झाला. यावरून गाडीचा प्रचंड प्रतिसाद लक्षात येतो.

नाशिकसाठी वरदान

नाशिक व संगमनेरमधील पाचशे शेतकरी रोज नाशिकहून किसान रेलने माल पाठवतात. देवळालीहून आठवड्यातून चार किसान ट्रेन चालतात. देवळालीहून आठ बोगीतून दर दिवशी दीडशे टन तर नाशिकरोडहून चार बोगीतून शंभर टन माल जातो. देवळाली, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, रावेर, सावदा, सांगोला, दानापूर, मुझफ्फरपूर, दिल्ली, शालिमार आदी ठिकाणी मालवाहतूक होते. सोलापूर विभागातून डाळिंब, द्राक्षे, लिंबू, सिमला मिर्ची, लातूर आणि उस्मानाबादहून फुले, नाशिकमधून कांदा, द्राक्ष, डाळींब, भुसावळहून केळी, नागपूरहून संत्री या गाडीने जाते. इतर फळे आणि भाजीपालाही दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालला जातो. ताजा माल जात असल्याने शेतकर्‍यांची बाजारपेठ व महसूल प्रचंड वाढला आहे.

30 हजार बेरोजगार

महाराष्ट्रातून देवळाली ते मुझ्झफरपूर सांगोला ते मुझ्झफरपूर, सांगोला ते दिल्ली, सांगोला ते शालीमार आणि सावदा ते दिल्ली आदी सहा किसान ट्रेन सुरु झाल्या. देवळाली ते दानापूर या टप्प्यात देवळाली, नाशिक, लासलगाव, मनमाड, खांडवा, भुसावळ, बुर्‍हाणपूर, प्रयागराज, बकसर, डीडीयू, मुझ्झफरपूर ही रेल्वेस्थानके मिळून एका किसान एक्सप्रेसवर तीस हजार रोजगार अवलंबून आहे. त्यात शेतमजूर, हमाल, व्हॅन-जीप चालक, पॅकिंग, पुष्ठावाले, व्यापारी आदींचा समावेश आहे. देशात किसान रेल्वे अन्य मार्गांवर बंद असल्याचा विचार करता बेरोजगारांची संख्या कितीतरी वाढते.

कार्टिंग एजंट कमलेश मोगल, भास्कर नरवडे, मनोज गवळी, हर्षल गांगुर्डे, गणेश भोसले म्हणाले की, किसान ट्रेन तातडीने सुरु करावी. ते शक्य नसेल तर सर्व प्रवाशी गाड्यांना शेतीमालाची एक तरी बोगी जोडावी. या गाड्यांना पाच मिनीटे थांबा द्यावा. किसान ट्रेनच्या बोगी देशभरात पडून आहेत. त्या प्रवाशी गाड्यांना एकेक जरी जोडल्या तरी शेतकर्‍यांना गॅरन्टी व नफा मिळेल. हजारोंना पुन्हा रोजगार मिळेल.

दयनीय अवस्था

किसान ट्रेन नाशिकला तीन तास लोडिंगसाठी थांबायची. देवळाली व नाशिकहून मिळून अडीचशे टन माल भरून गाडी सकाळी अकराला निघून दुसर्‍या दिवशी बिहारला ताजा माल पोहाचायचा. आता सहा-सात प्रवाशी (मेल) गाड्यांव्दारे माल जातो. या गाड्या नाशिकला पाच मिनीटेही थांबत नाही. त्यातून दररोज कसाबसा पंधरा टन माल जातो. राहिलेला फेकून द्यावा लागतो. मेल गाड्यांना अनुदान नसल्याने शेतकर्‍यांचे डबल नुकसान होते. कोविडपासून कोलकत्यासाठी 00113 ही गाडी शेतीमाल घेऊन जात होती. तिच्या दोन बोग्यातून 35 टन माल नाशिकचा जायचा. मात्र, ही गाडी आता खासगी व्यापार्‍याने मुंबईहून बुक केल्याने तो मार्गही बंद झाला आहे.

असा होतो तोटा

किसान ट्रेन आठवड्यातून चार दिवस देवळालीतून सुटते. तीच्या 22 बोग्यांपैकी देवळालीला 8, नाशिकरोडला 4, लासलागावला 2, मनमाडला 8 साठी बुक असतात. एक बोगीतून 24 टन माल जातो. एका किलोला 2.20 पैसे भाडे आहे. असे 50 हजार भाडे एका बोगीचे होते. उर्वरीत 50 हजार केंद्राचे अनुदान असते. त्यामुळे शेतकर्‍याला फायदा व्हायचा. आता प्रवाशी गाडीतून माल पाठविण्यासाठी किलोला 6.50 रुपये भाडे मोजावे लागते. त्यातही माल जाण्याची गॅरन्टी नाही. जेथे किसानमधून दिवसाला दोनशे टन माल जातो तेथे प्रवाशी गाडीतून पंधरा टनच माल जातो. नाशिकच्या एका किसान ट्रेनव्दारे रेल्वेला महिन्याला 3.50 कोटी असा घसघशीत महसूल मिळतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या