
मुंबई | Mumbai
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांचा फेब्रुवारी महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता. मात्र त्यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. वारिसे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे विरोधी पक्षांनी ( opposition parties) आणि पत्रकार संघटनांनी सरकारला धारेवर धरले होते. या प्रकरणात आता स्वतः सरकारनेच धक्कादायक खुलासा केला आहे.
शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांचा अपघात (accident) त्यांना संपवण्याच्या हेतूने ठरवून घडवून आणण्यात आला होता, अशी कबुली राज्य सरकारने एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे. अधिवेशनदरम्यान विधान परिषदेत विरोधकांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावर सरकारने उत्तर दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. एसआयटी मार्फत चौकशी सुरू असून लवकरच अधिक माहिती समोर येईल, असेही उत्तरात म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) राजापूर येथे पत्रकार शशिकांत वारीसे (Shashikant Warise) यांचा ६ फेब्रुवारीला अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वारीसे यांना कोल्हापूरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, ७ फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक पंढरीनाथ आंबेरकरला अटक करण्यात आले आहे.