Jitendra Awad : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढणार!
मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील स्थापत्य अभियंता अनंत करमुसे यांना मारहाण केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ५०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात जितेंद्र आव्हाडांवर गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.
आव्हाड हे मंत्री असताना ५ एप्रिल २०२० मध्ये अनंत करमुसे यांना मारहाण झाली होती. ही मारहाण आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात त्रुटी असल्याचे आरोप करत करमुसे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात यापूर्वी तीन आरोपपत्र दाखल आहेत.
दरम्यान जितेंद्र आव्हाड यांचा माजी बॉडीगार्ड वैभव कदमने आत्महत्या केल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला होता. तळोजा रेल्वे स्थानकाजवळ त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. ट्रेनच्या धडकेनं त्यांचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टम अहवालात म्हटल. अनंत करमुसे मारहाणीवेळी वैभव कदम जितेंद्र आव्हाड यांचा बॉडीगार्ड होता.
अनंत करमुसे प्रकरणात वैभव कदमलाही आरोपी करण्यात आलं होते. सध्या ठाणे पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू होती. आत्महत्या करण्या आधी वैभव कदम यांनी सोशल मीडियावर मी अपराधी नाही, अशी पोस्ट केली होती. कदम यांची माफीचा साक्षीदार होण्याची तयारी होती. त्यामुळे त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप भाजप नेते मोहित कंबोज यांनी केला होता.