Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यानार-पारच्या पाण्यासाठी ध्यास आवश्यक - पालकमंत्री छगन भुजबळ

नार-पारच्या पाण्यासाठी ध्यास आवश्यक – पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक । प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या भूमीवर पडणार्‍या पावसाच्या प्रत्येक थेंबावर महाराष्ट्राचा हक्क आहे. आपण वापरत नाही म्हणून गुजरातला या पाण्याचा कायमस्वरूपी हक्क जलकराराद्वारे देण्यात येऊ नये. हे पाणी उचलून उत्तर महाराष्ट्रात वळविण्यासाठी कितीही खर्च आला तरी तो करण्याची तयारी दाखवली पाहिजे.

- Advertisement -

नार-पार चे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य आहे. मात्र हा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी एक ध्यास घेऊन सर्वांनी एकत्र येऊन एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र जलपरिषद मार्फत ऑनलाईन 14 ते 17 मे अशी चार दिवशीय व्हर्चुअल रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये तिसर्‍या दिवशी प्रमुख वक्ते म्हणून छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, जलतज्ञ राजेंद्र जाधव, जलअभ्यासक सुरेश पाटील, भिला पाटील आदींनी आपले विचार व्यक्त केले.

याप्रसंगी भुजबळ म्हणाले, नार-पार चे पाणी उत्तर महाराष्ट्रात वळविणे शक्य आहे. हे मांजरपाडा प्रकल्पाद्वारे सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे मांजरपाडा-1 या प्रकल्पाकडे पथदर्शी प्रकल्प म्हणून बघितले पाहिजे. अशा प्रकारे सह्याद्रीच्या डोंगररांगेत अनेक ठिकाणी बोगदे करून समुद्राला वाया जाणारे पाणी उत्तर महाराष्ट्रात आणणे शक्य आहे. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

यावेळी जलतज्ञ अभियंता राजेंद्र जाधव म्हणाले, नर्मदा-तापी खोर्‍यात महाराष्ट्रावर गुजरातने अन्याय करून कमी पाणी दिले आहे. तापीच्या पाण्याचा उपयोग महाराष्ट्राला करावयाचा झाल्यास ते पाणी उकाई धरणातून लिफ्ट करून गिरणा-पांझरा-बोरी-बुराई या नद्यांमध्ये टाकावे लागेल.

सबब उकाई धरणातून 50 टीएमसी पाणी लिफ्ट करण्याची मागणी केंद्र सरकार व गुजरात सरकारकडे केली पाहिजे. भुजबळ यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यामुळे मागच्या सरकारला गुजरात बरोबर करार करण्यापासून आम्ही रोखू शकलो. मात्र आता दमणगंगा-नार-पारचे पाणी उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात पोहचवण्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे. अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रस्तावित केले. एन.एम.भामरे यांनी सूत्रसंचालन केले.

5 नदीजोडचे अहवाल तयार

गेल्या दहा वर्षापासून छगन भुजबळ, दादा भुसे, खा.हेमंत गोडसे, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ, माजी आमदार जयंत जाधव व जलचिंतन संस्था यांच्या सामुहिक पाठपुराव्यामुळे पाच नदीजोड प्रकल्पांचे अहवाल तयार झालेले आहेत. त्यामध्ये नार-पार गिरणा लिंक-12.5 टीएमसी, पार-कादवा लिंक- 3.5 टीएमसी, दमणगंगा-एकदरे लिंक-5 टीएमसी, गारगाई-वैतरणा-कळवा-देवलिंक-07 टीएमसी, दमणगंगा-पिंजाळ लिंक-31 टीएमसी, वैतरणा-गोदावरी लिंक-11 टीएमसी असे एकूण 70 टीएमसी पाणी उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात वळविण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या