
अहमदाबाद | Ahmedabad
आयपीएल २०२३ स्पर्धेतील अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील अंतिम सामना रविवारी खेळवला जाणार होता.
मात्र पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. २८ मे रोजी पावसाने अहमदाबादमध्ये जोरदार बॅटिंग केली. आधी क्लोसिंग सेरेमनी, मग टॉस आणि शेवटी हा सामना पुढे ढकलण्यात आला आहे. मात्र आजही पाऊस पडल्यास सामन्याचा निकाल कसा लावला जाईल? किती ओव्हर्स कमी केल्या जातील? समजनू घ्या कसं असेल सामन्याचं समीकरण.
आजचाही सामना पावसाने वाहून गेला तर?
राखीव दिवस म्हणजेच सामना आज रात्री ९.३५ वाजता सुरू झाला तर षटकांमध्ये कोणतीही कपात होणार नाही. यानंतर षटकांचे कटिंग सुरू होईल. आज रात्री ९.३५ नंतर पाऊस पडत राहिला तर पाच षटकांच्या सामन्यासाठी रात्री १२.०६ पर्यंत थांबावे लागेल.
तसे न झाल्यास सुपर ओव्हर करण्याचा प्रयत्न केला जाईल. खराब हवामानामुळे सुपर ओव्हर देखील अयशस्वी झाल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानावर असल्याने गुजरात टायटन्सला आयपीएल २०२३ चा विजेता म्हणून घोषित केले जाईल. कारण ते २० गुणांसह गुणतालिकेत अव्वल आहेत.
या मोसमात गुजरातने १४ पैकी १० सामने जिंकले आहेत. त्याचवेळी चेन्नईचे १४ सामन्यांत १७ गुण आहेत. धोनीच्या संघाने १४ पैकी ८ सामने जिंकले आहेत. ५ मध्ये त्याचा पराभव झाला आणि एक सामना पावसामुळे खेळता आला नाही, त्यामुळे त्यांना १ गुण मिळाला.
आजही पाऊस पडण्याची शक्यता?
आज म्हणजे रिझर्व्ह डेच्या दिवशी देखील पाऊस पडू शकतो. मात्र सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता केवळ ३ टक्के आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्याची शक्यता ३४ टक्के आहे. तर ताशी ११ किमी वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय आर्द्रता ५५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. त्याच वेळी, तापमान ३२ अंशांच्या आसपास असेल.
पाऊस पुन्हा जोरदार बॅटिंग करणार का? की चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज सामना सुरू असताना पाऊस पडण्याची शक्यता नहीच्या बरोबर आहे. मात्र सामन्यापूर्वी पाऊस पडू शकतो. त्यामुळे सामना सुरू होण्यास उशिर होऊ शकतो.