पुणे :
भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदाच्या नैर्ऋृत्य मोसमी वाऱ्यांसोबत येणाऱ्या पावसाचा दुसरा सुधारित अंदाज जाहीर केला. त्यानुसार जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. परंतु मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे नाशिक, नगर, जळगाव, धुळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सुधारित अंदाजानुसार, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात सरासरीइतका किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज असला, तरी मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. खरीप हंगामातील पिकांच्या दृष्टीने पावसाचा अंदाज सकारात्मक आहे.
मॉन्सून बाबत बोलताना, हवामान खात्यांचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा म्हणाले की, वायव्य भारतामध्ये सामान्य पावसाची अपेक्षा आम्ही करत आहोत तर जम्मू-काश्मीर, लेह आणि लडाख प्रदेशात सामान्यपेक्षा काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मॉन्सूनचे आगमन उशिरा?
सध्या केरळमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस पडतो आहे. अंदमानात पोहोचलेला मॉन्सून केरळात पोहोचल्याचे जाहीर करण्यासाठी आवश्यक पाऊसमान, वाऱ्यांची दिशा हे निकष अजून पूर्ण झालेेले नाहीत. त्यामुळे यंदा मॉन्सून केरळात थोडा उशिरा म्हणजे ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मॉन्सून आल्यानंतर त्याच्या पुढच्या वाटचालीबद्दल सांगितले जाते. मात्र केरळातील आगमनानंतरही मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस थोडा उशीर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.