निर्यात शुल्कवाढीचा द्राक्षांना फटका

केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान
निर्यात शुल्कवाढीचा द्राक्षांना फटका

निफाड । प्रतिनिधी Niphad

बांगलादेशमध्ये निर्यात होणार्‍या द्राक्षांवर एक्सपोर्ट ड्युटी ( Export duty on grapes)लावण्यात आल्यामुळे व्यापार्‍यांनी होणारे नुकसान शेतकर्‍यांकडून काढण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत बांगलादेशला पाठवण्यात येणार्‍या द्राक्षांची निर्यात ( Grapes Export)थांबली असून कमी भावात ही द्राक्षे भारतात उपलब्ध होत असल्याने थॉमसनसारख्या व्हरायटीला अल्प दर मिळत आहे.

केंद्र सरकारने बांगलादेशला भारतातून द्राक्ष पाठवण्यासाठी कंटेनरमागे दुप्पट शुल्क लावले आहे. त्याचा भार व्यापारी आपल्यावर न घेता शेतकर्‍यांच्या माथी मारत आहेत. दरवर्षी 40 ते 45 रुपये किलोने बांगलादेशला पाठवण्यात येणार्‍या अनुष्का, आरके, एसएसएन, सोनाका या व्हरायटीची द्राक्षे भारतातच 35 ते 40 रुपये दराने व्यापार्‍यांना देण्यात द्राक्ष उत्पादकांनी पसंती दर्शवली आहे. दुप्पट एक्सपोर्ट ड्युटी भरण्यापेक्षा देशांतर्गत द्राक्ष देण्यात वावगे काय, अशी समजूतच शेतकर्‍यांनी घालून घेतली आहे.

याचा फटका मात्र देशांतर्गत दरवर्षी विकल्या जाणार्‍या थॉमसनसारख्या छोट्या आकाराच्या द्राक्षांना बसत आहे. अनुष्का, आरके, एसएसएन, सोनाका ही लांब आकाराची द्राक्षे भारतात 35 ते 40 रुपये किलो दरात मिळत असल्याने थॉमसन जातीच्या द्राक्षाकडे स्थानिक ग्राहक पाठ फिरवत असल्याची वस्तुस्थिती आहे. परिणामी सर्वच द्राक्ष उत्पादकांना मोठा फटाका सहन करावा लागत आहे.

केंद्र सरकारच्या या धोरणाचा फटका राज्यातील द्राक्ष उत्पादकांना बसत असून यावर गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी शेतकरीवर्ग करत आहे. दरम्यान, बांगलादेशला पाठवण्यात येणार्‍या द्राक्षांवर लावण्यात आलेल्या दुप्पट एक्सपोर्ट ड्युटीमुळे लोकल द्राक्षांच्या दरावर मोठा परिणाम होत आहे. याचा फटका पूर्णपणे द्राक्ष उत्पादकांनाच बसत असल्याचे द्राक्ष निर्यातीतील अभ्यासक जगन्नाथखापरे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com