
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अंबड औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी (MIDC) प्रशासन व महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अतिक्रमणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून नक्की कुणाच्या दबावामुळे येथे अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात नाही असा सवाल उद्योजकांनी विचारला आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये (Ambad Industrial Estate) एमआयडीसी ने प्लॉट तयार करून उद्योजकांना विकले त्यावर उद्योजकांनी गाळे बांधून आपला उद्योग सुरु केला मात्र त्याठिकाणी काही लोकांनी समोर असलेल्या मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण केल्याने उद्योजकांना त्याचा मोठ्याप्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
एक्सलो पॉइंट कडून गरवारे च्या दिशेने जात असतांना मुख्य रस्त्याच्या दुतर्फा येथे अतिक्रमण (Encroachment) करून बऱ्याच जणांनी आपले अतिक्रमित दुकाने थाटली आहेत. तसेच, सिमेन्स कंपनीच्या समोरील बाजूसही मोठ्याप्रमाणावर अतिक्रमित दुकाने थाटलेली दिसून येत आहेत. याबाबत बऱ्याचदा उद्योजकांनी एमआयडीसी कडे तक्रारी केल्या होत्या मात्र सदरहू काम हे महापालिकेचे (Municipal Corporation) असल्याचे कारण देत आपली जबाबदारी झटकल्याचे काही उद्योजकांनी सांगितले. महापालिका अतिक्रमण विभाग याठिकाणी कारवाईस आला तर राजकीय हस्तक्षेपामुळे त्यांना देखील येथील अतिक्रमण काढणे कठीण झाल्याचे दिसून येते.
सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असून त्याचा फायदा घेत राजकीय दबावाला न जुमानता अंबड औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमण हटवणे महापालिका अतिक्रमण विभागाला सोयीचे होईल. सिमेन्स कंपनीच्या समोरच रस्त्यालगतच काही मांस विक्रेत्यांनी देखील आपले अतिक्रमित दुकान थाटले असून ते मांसाचा उर्वरीत कचरा देखील रस्त्यावरच टाकून देत असल्याने बऱ्याचदा कामगार वर्गाला दुर्गंधीचा सामना करत मार्गक्रमण करावे लागते. याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा देखील उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये काही ठिकाणी असलेल्या अतिक्रमित छोट्या टपऱ्यांवर चोरून दारूची विक्री होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते त्यावेळी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदरहू टपरीधारकांना चोप देऊन त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले होते. सध्या असा प्रकार निदर्शनास नसला तरी पुन्हा याठिकाणी अवैध व्यवसाय सुरु होऊ नये याकरिता येथील अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.