मुंबई | Mumbai
उन्हाळ्यात यावर्षी वातावरणाचे विविध रंग पाहिले आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात पाऊस पडला. मार्च महिन्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले. एप्रिल महिन्याने पावसाचा सर्व उच्चांक मोडला. मे महिन्याच्या सुरुवातीला घरातील कुलर एसी आणि पंखे बंद होते. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होऊ लागली.
आता पुन्हा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वातावरणाचे विविध रंग दिसत आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे विदर्भात मात्र अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २-३ दिवस विदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतर काही ठिकाणी ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने वातावरण ढगाळ राहील. राज्यात काही ठिकाणी पाऊस पडेल मात्र तीव्रता कमी असेल. पुढील आठवडा पुण्यातील वातावरण अंशतः ढगाळ असणार आहे. जळगाव जिल्ह्यातही पाऊस येणार नाही, मात्र ढगाळ वातावरण होऊ शकतं. दरम्यान, शनिवारी ज्येष्ठ महिना सुरु झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. मात्र, २६ तारखेला काही प्रमाणात ढगाळ वातावरण होणार आहे.
दरम्यान विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मंगळवारी उन्हाची तीव्रता अधिक होती. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात वातावरण कोरडे असून कमाल तापमान हे सरासरीइतके होते. उत्तर महाराष्ट्रात मंगळवारी उन्हासोबत उकाडाही जाणवत होता.
पश्चिमी चक्रवाताचा वायव्य भारतावर प्रभाव रहाणार असून २३ ते २६ मेदरम्यान चक्रीवादळाची शक्यता आहे. यादरम्यान अरबी समुद्रातुन आर्द्रतेचाही पुरवठा होणार असल्याने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब या राज्यांत जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.