
मुंबई | Mumbai
राज्यात मान्सूनचे आगमन हे उशीरा झाल्यामुळे अनेक शहरात पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील खोळंबळ्या आहेत. राज्याच्या अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी (Heavy Rain) लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये (Farmers) आनंदाचं वातावरण आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती. अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे.
दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे.
पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी उपग्रह छायाचित्र जारी केले आहे. त्यात विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यभरावर मान्सूनचे ढग जमा झाल्याचे दिसत आहे. त्यानुसार आगामी दोन, तीन दिवस कोकणात विशेषत: रायगड, सिंधूदुर्ग येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबतच पश्चिम मराठवाड्यातील काही भाग व मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबई, ठाण्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सूनचे राज्यात उशीराने आगमन झाले. मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाला. पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. पण आता पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबई, मुंबई उपनगर आणि नवी मुंबईत देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना घडल्या होत्या. तर या पावसामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता.