नवी दिल्ली :
भारतीय न्यायव्यवस्थेची अवस्था जीर्ण झाली आहे. न्यायालयात न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे, असा दावा माजी सरन्यायाधीश आणि राज्यसभा खासदार रंजन गोगोई यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीने आयोजित कार्यक्रमात रंजन गोगोई बोलत होते. या कार्यक्रमात रंजन गोगोई यांनी अनेक विषयांवर आपली मते मांडली. सरकारमध्ये अधिकारी नेमतात तशी न्यायाधीशांची नेमणूक होत नाही. कामासाठी योग्य व्यक्ती मिळणे महत्त्वाचे असते. व्यावसायिक न्यायालयांचा काही उपयोग नाही. अर्थव्यवस्थेत सुधारणा करायची असेल, तर भक्कम व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे.
न्यायाधीशाची पूर्ण काळ वचनबद्धता असते. कामाचे तास निश्चित नसतात. पहाटे २ वाजता उठूनही आम्ही काम केले आहे. सर्वकाही बाजूला ठेवून न्यायाधीश काम करत असतात. याची जाणीव किती लोकांना आहे. न्यायाधीश नेमले जातात, तेव्हा त्यांना प्रशिक्षणाची गरज असते. त्यांना त्याची जाणीव करून दिली पाहिजे. न्यायिक नीतितत्त्वांशी काही संबंध नाही, अशा गोष्टी भोपाळच्या राष्ट्रीय न्यायिक अकादमीत काय शिकवतात. निकाल कसा लिहावा, हे शिकवले जात नाही. न्यायालयीन कामकाजात कसे वागावे हे शिकवले जात नाही, अशी खंत रंजन गोगोई यांनी व्यक्त केली.