Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याIND vs SL : भारताचा सलग सातवा विजय; लंकेचा पालापाचोळा!

IND vs SL : भारताचा सलग सातवा विजय; लंकेचा पालापाचोळा!

मुंबई | Mumbai

भारतीय संघाने श्रीलंकेचा 302 धावांनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या साखळीत सलग सातवा विजय साजरा केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचे मोठे आव्हान दिले होते. पण त्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची अवघ्या धावांत दाणादाण उडाली. भारताच्या जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शामी या वेगवान त्रिकूटाने श्रीलंकेचा डाव धावांत गुंडाळण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याआधी भारताच्या शुभमन गिलचं शतक आठ धावांनी हुकले.

- Advertisement -

सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याचे विराट कोहलीचे स्वप्नही 12 धावांनी भंगले. पण त्या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी रचलेल्या 189 धावांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने 50 षटकांत आठ बाद 357 धावांची मजल मारली. भारतीय संघाने श्रीलंकेला अजिबात संघर्ष करण्याची संधी दिली नाही. 358 धावांचा बचाव करताना पहिल्या चेंडूपासूनच लंकेवर वर्चस्व गाजवले. जसप्रीत बुमराहने पहिल्याच चेंडूवर लंकेला धक्का दिला. त्यानंतर सिराज आणि शामी यांनी सावरायची संधीच दिली नाही. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 55 धावांवर गुंडाळत 302 धावांनी विजय मिळवला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला. शामी-सिराज आणि बुमराहच्या मार्‍यापुढे लंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. लंकेचे पाच फलंदाज खातेही न उघडता तंबूत परतले. कर्णधार कुसल मेंडिस फक्त एका धावेवर बाद झाला. त्यानंतर अंझलो मॅथ्यूज याने 12 धावा केल्या. 29 धावांत लंकेचे आठ फलंदाज तंबूत परतले होते. महिश तिक्ष्णा आणि रजिथा यांनी अखेरीस थोड्याफार धावा केल्यामुळे 50 लंकेनं 50 धावसंख्या ओलांडली. तिक्ष्णा 12 धावांवर नाबाद राहिला. तर रजिथा याने 14 धावा केल्या. मधुशंका पाच धावांवर बाद झाला. भारताकडून मोहम्मद शामीने पाच विकेट घेतल्या तर सिराजनेही तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

श्रीलंकेचा पराभव करत भारताने विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताचा हा सलग सातवा विजय आहे. यंदाच्या विश्वचषकात सेमीफायनलमध्ये पोहचणारा भारत पहिला संघ आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारताने आपला फॉर्म कायम राखत विजय नोंदवला. भारतीय संघाने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान काबिज केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या