
मुंबई | Mumbai
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बाजारात थंडगार फळांचाही प्रवेश झाला आहे. यासोबचत फळांचा राजा आंब्यानेही बाजारात एंट्री केली आहे. तसं आंबाप्रेमी आणि हापूस हे मिळतं जुळतं गणित. कोकणातला हापूस आणि महाराष्ट्र हे वेगळ नातं. हापूसचा कितीही दर वाढला असला तरी लोकांकडून त्याची मागणी कमी होत नाही.
संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूनही याला जास्त मागणी आहे. मग यामध्ये देवगड हापूस असेल, रत्नागिरी हापूस असेल असे अनेक प्रकार मोडतात. अगदी हजारो रुपयांत विकला जाणारा हापूस सर्वांना चाखायला हवाच असतो. मात्र अलीकडे गेली काही वर्ष हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक होत आहे. देवगड, रत्नागिरी हापूस म्हणून ग्राहकाला प्रलोभने देत त्यांची लुबाडणूक केली जात आहे. त्यामुळे हापूस आंबा ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
अस्सल हापूस आंबा नेमका ओळखायचा तरी कसा?
हापूस आंब्याचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्याचा सुगंध. हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो आणि त्याचा घमघमाट हा सर्व खोलीभर पसरतो.
हल्ली आंबा कृत्रिम पद्धतीने म्हणजेच रसायनांचा वापर करून पिकवतात. नैसर्गिकरित्या पिकलेला हापूस आंबा मऊ आणि नरम असतो तर कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा कडक असतो.
कृत्रिमरित्या पिकवलेल्या हापूसचा रंग एकसारखाच असतो. तर नैसर्गिकरित्या पिकलेला हापूस पिवळसर आणि फिकट हिरव्या रंगाचा असतो. कारण तो आंबा हळूहळू पिकलेला असतो.
हापूस आंब्याची साल सहज काढता येते, त्याला गर लागत नाही. कारण तो नैसर्गिकरित्या पिकलेला असतो.
हापूसचा सुगंध आणि त्याचा गर ही त्याची उत्तम ओळख आहे.
खरा हापूस ओळखण्याचे एक घरगुती तंत्र आहे. ते म्हणजे एका भांड्यात किंवा पातेल्यात पाणी घ्या आणि त्यात आंबा टाका. नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा त्यात बुडतो त्याउलट कृत्रिमरित्या पिकलेला आंबा पाण्यावर तरंगतो.
शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते. त्यात कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे कळते.
तुम्ही जर खरोखरच आंब्याचे पारखी आणि खवय्ये असाल तर अनेक वर्षांच्या अनुभवातून तुमची नजर तयार झालेली असते. त्यामुळे फक्त आंब्यावरून टाकलेली एक पारखी नजरदेखील तुम्हाला हापूसची ओळख पटवू शकते.