मुंबई:
भाजप सरकारच्या (bjp goverment) काळात झालेलं फोन टॅपिंगचं (phone tapping) प्रकरण भाजपला भोवण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (dilip walse patil) यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
विधानसभा सदस्य .नाना पटोले (nana patole) यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
अधिवेशनाच्या (monsoon session )दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आज फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. 2016-17 मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.