
मुंबई | Mumbai
महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) १२ जणांची यादी राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे पाठविली होती. मात्र कोश्यारी यांनी ती यादी आपल्याकडेच ठेवली होती. त्यानंतर मविआचे सरकार कोसळल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने नवीन यादी पाठवली होती. मात्र त्याविरोधात सुनील मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका (Petition) दाखल केली होती. त्या याचिकेवर आता लवकरच सुनावणी होणार आहे...
याचिकाकर्ते सुनील मोदी (Sunil Modi) यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने जी मुळ यादी दिली आहे, तीच यादी कायम ठेवावी. तसेच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार काम करायला हवे. परंतु, राज्यपालांनी घटेनची पायमल्ली केली आहे, असे मोदी यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर आता या याचिकेवर शुक्रवार (दि.१२) रोजी सुनावणी (Hearing) होणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष्य या सुनावणीकडे लागले आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा (Power Struggle in Maharashtra) निकाल लवकरच लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर झाली होती. त्यापैकी एक न्यायाधीश एम.आर. शाह हे १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. तसेच १३ आणि १४ मे रोजी शनिवार, रविवार असल्याने सुट्टी आहे. त्यामुळे उद्या किंवा परवा निकाल येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.