मुंबई | Mumbai
उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मृत्यू पावलेल्या रुग्णांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात आणले होते. त्यामुळे या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. मात्र २४ तासांत इतके मृत्यू झाल्याने पालिका रुग्णालयाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या प्रकरणावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तानाजी सावंत म्हणाले, “पहिले ५ मृत्यू झाल्यानंतर मी सर्व माहिती घेतली होती. रात्री १७ रुग्णांचे मृत्यू झालेत, त्यासंदर्भात सर्व माहिती मी माहिती घेतली आहे. पहिले ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल १ ते २ दिवसात येईल. यानंतर रात्री १७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील १३ आयसीयू आणि ५ जनरल वॉर्डमध्ये झाले. तसेच १७ रुग्णांचा मृत्यू नेमके शामुळे झालेत याचा अहवाल मागविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर दोषींवर योग्यती कारवाई केली जाईल”, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
५ रुग्णांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाला जाग आली नाही; ठाण्यात रूग्णालयातील १७ जणांच्या मृत्यूनंतर शरद पवारांचे ट्विट
दरम्यान, या प्रकारावरुन जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) रोष व्यक्त करत ठाणे प्रशासनावर आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आत जाण्याचा रस्ता मोठा आहे, पण हॉस्पिटलच्या आतमधून बाहेर येण्याचा रस्ता फक्त वरती आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. या सर्व प्रकरणांनंतरही ठाण्याच्या प्रशासनाला जाग येत नसल्याची खंत आव्हाडांनी व्यक्त केली. ठाण्याच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नर्सेस कमी आहेत, डॉक्टर्स कमी आहेत, याची जबाबदारी कोणी स्वीकारणार की नाही? असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. गरीब लोक फक्त मरण्यासाठी जन्माला येतात का? असा संतप्त सवाल देखील आव्हाडांनी केला आहे.
ठाण्यात फक्त रंग-रंगोटी, लायटिंग करण्याचं काम झालं, त्यात ४००-५०० कोटी रुपये घातले असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महिनाभरात त्या लाईट्स बंद पडल्या तरी चालतील, त्यांची बिलं काढली की यांचं काम झालं, असंही ते म्हणाले. ठाण्याचे मुख्यमंत्री आहेत हे आमचं भाग्य आहे, ठाण्याला एवढं मोठं पद मिळतं आणि प्रतिष्ठेचा माणूस मिळाला आहे, पण हृदयाच थोडं ममत्व, थोडी माया, गरिबाबद्दल थोडीशी आपुलकी असायला हवी, असा खोचक उपदेश आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला.