नाशिक | प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून जात पंचायतची अमानुष प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे जात पंचायतचे अघोरी व अन्यायी न्यायनिवाडे व शिक्षेचे प्रकार पाहण्यास मिळत आहेत. यामध्ये विशेषत: महिला बळी पडण्याचे दिसून येत आहेत…
नुकताच अशा न्यायनिवाडयाचा एक अमानुष व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल झाला आहे. या व्यक्तीने एका महिलेवर चारित्र्याचा संशय घेतला. या समाजात विचित्र पद्धतीने न्यायनिवाडा करण्यात येतो. या न्यायनिवाड्यातून महिलेचे चारित्र्य तपासले जाते.
यानुसार या महिलेला आधी तीन दगडांची चुल मांडण्यास सांगण्यात आले. त्यानंतर महिलेने सरपण लावून चुल पेटवली. चुलीवर एका कढईत तेल टाकले आणि त्या चुलीवरील कढईतील तेल उकळविण्यास सुरुवात केली.
तेलाला उकळी आल्यावर एका पुरुषाने पाच रूपयांचे नाणे त्या तेलात टाकले. जेव्हा हे नाणे तेलात टाकले तेव्हा ते तेल उकळताना दिसून येत होते.
यानंतर या पुरुषाने या महिलेला ते नाणे रिकाम्या हाताने म्हणजेच हातात काहीही न घालता बाहेर काढण्यास सांगितले. महिलेने खुप विरोध केला. मात्र, चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती यावेळी करण्यात आली.
उकळत्या तेलातुन नाणे बाहेर काढतांना महिलेचा हाथ भाजला नाही तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते व हात भाजला तर चारित्र्य शुद्ध नाही, असे या समाजात समजले जाते.
अशा अमानुष न्यायनिवाड्याला अनुसरून या महिलेने उकळत्या तेलात हात घातला व तिचा हात भाजला. संबंधित पुरुषाने या घटनेचा व्हिडिओ काढला व व्हायरलही केला आहे.
या घटनेची चौकशी होऊन जात पंचायत विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे.
असे न्यायनिवाडे अंधश्रद्धेवर आधारित असून अवैज्ञानिक आहेत. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडे या घटनेचा पाठपुरावा करणार असल्याचे चांदगुडे यांनी देशदूतशी बोलताना सांगितले.