भुसावळ । प्रतिनिधी bhusawal
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात या पावसाळ्यातील पहीलाच पाऊस झाल्याने पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दि.6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता, हतनुर धरणाची पाणी पातळी वाढण्यास सुरूवात झालेली असून चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. यातून 136.00 क्युमेक्स (4803 क्युसेस) पाणी सोडण्यात येत असल्याचे हतनूर प्रकल्प अभियंता श्री.चौधरी यांनी सांगितले. तापी नदी पात्रात हतनूर धरणामधून पाणी प्रवाह सोडण्यात आल्याने हतनूर धरणाचे खालील नदीकाठच्या गावांमध्ये सूचना देऊन तापी नदी पात्रांमध्ये कुणीही गुरेढोरे सोडू नये अथवा कोणी तापीनदी पात्रांमध्ये जावू नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
भुसावळ शहरात पावसाची दमदार हजेरी
पावसाळा सुरू झाल्यानंतर जवळपास एक महिन्याच्या अंतराने शहरात दि. 6 रोजी दुपारी सरीवर सरीवर बरसल्या या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना काही प्रमाणावर जीवनदान मिळाले आहे. तर उद्यापासून अन्य राहिलेल्या पेरण्या सुरू होणार आहेत. आजच्या पावसाने शहरातील सखलभागात पाणी साचले होते. तर जामनेर रोडवर रंगोली हॉटेल समोर नालासदृश्य चित्र रस्त्यावरच निर्माण झालेले पाहायला मिळाले. या पावसाने वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीशी सुटका मिळाली आहे.