
दिल्ली | Delhi
देशात सध्या नव्या व्हायरसची साथ पसरली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचं कारण म्हणजे संपूर्ण देशभरात अनेकांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं जाणवत आहे. यावर कोणतंही औषध घेतलं जरी खोकला जात नसल्याने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) यामागील कारण स्पष्ट केलं आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण देशात ताप (Fever) आणि खोकल्याच्या (Cough) घटना वाढण्यामागे ‘इन्फ्लुएंजा ए सबटाइप H3N2’ व्हायरस (Influenza A subtype H3N2) आहे. हा व्हायरस H3N2 व्हायरसचा उपप्रकार असल्याचं आयसीएमआरने सांगितलं आहे. दरम्यान, हा आजार जीवघेणा नसल्याचं आयसीएमआरने स्पष्ट केलं आहे.
तापमानामध्ये होणारे बदल प्रदूषण आणि प्रतिकारक शक्तीची कमतरता या आजाराला पोषक ठरते आहे. रुग्णाला बरे होण्यासाठी किमान दोन ते तीन आठवल्याचा कालावधी लागत आहे. महाराष्ट्रात याचे सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने दिली आहे. या साथीने बेजार झालेले अनेक रुग्ण घराघरामध्ये आढळत आहेत.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेकडे (आयसीएमआर) उपलब्ध असलेल्या माहितीनुसार हा विषाणू एच-3 एन-2 स्वरूपाचा आहे. एन्फ्ल्यूएन्झा-फ्लूचा एक उपविषाणू म्हणून तो ओळखला जातो. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये संपूर्ण देशात हा विषाणू हवेतून संक्रमण करतो आहे. लक्षणे दिसताच रुग्णालयाशी संपर्क साधून त्यावर उपचार झाले, तर रुग्ण गंभीर होण्यापासून वाचू शकतो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
काय आहेत ICMR ची मार्गदर्शक तत्वं ?
– साबणाने वारंवार हात धुवा
– गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
– घराबाहेर पडताना मास्क वापरा.
– खोकताना आणि शिंकताना तोंड झाका
– हात धुतल्याशिवाय डोळे आणि तोंडाला स्पर्श करू नका
– खोकल्याची लक्षणे असल्यास गरम पाणी प्या आणि वाफ घ्या
– मीठ घालून कोमट पाण्याने गुळण्या करा
– ताप किंवा अंगदुखी असल्यास पॅरासिटामॉल घ्या. मात्र वेळीच डॉक्टरांचा सल्ल घ्या व औषधे घ्या.
– जेव्हा तुम्हाला सर्वात प्रारंभिक लक्षणे दिसतात तेव्हा स्वतःला वेगळे करा
काय करु नये?
हास्तांदोलन करुन भेटणं किंवा अन्य अशाप्रकारे भेटणं ज्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला स्पर्श करावा लागेल.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणं.
स्वत: औषधांबद्दलचे निर्णय घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
घराबाहेर कोणत्याही ठिकाणी दुसऱ्या व्यक्तींच्या बाजूला बसून जेवतना सुरक्षित अंतर ठेवा.