
मुंबई | Mumbai
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही तसंच समर्थांशिवाय (Samarth Ramdas) शिवाजी महाराज नाहीत असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.
राज्यपाल काल औरंगाबादमध्ये (Aurangabad) मराठी भाषा गौरव दिवस आणि श्री दास नवमी निमित्त आयोजित केलेल्या समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले असताना त्यांनी आपल्या भाषणामध्ये हे वक्तव्य केलं. यावरुन आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे.
राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नाही, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला दिला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये मध्ये म्हंटले आहे की, 'मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. १६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या निकालानुसार... 'तपास अधिकाऱ्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही.'
'छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण हे शरद पवार यांनी स्पष्टपणे आपल्या भाषणात सांगितले आहे. ते म्हणतात,“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं…रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाता होत्या. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व घडविले हे जिजामातांच्या संस्कांरांनी… त्यामुळे तुम्ही शिवाजी महाराजांचा कालखंड नीट अभ्यासला तर त्या कालखंडामध्ये रामदास नव्हते. काही लोकांच्या हातात लेखणी होती, त्यामुळे या कर्तृत्वसंपन्न महामानवाला रामदासांनी घडविलं अशी लेखणीची कमालकृत्ये केली,' असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.
तसेच, 'आणि आम्ही जे लोकं मानू लागलो की महाराजांचे जे कर्तृत्व आहे ते रामदासांमुळे आहे,हे खरं नव्हे. कर्तृत्व हे स्वकर्तृत्व, शौर्य, मार्गदर्शन आणि मातेचे संस्कार यामधून महानायकाचे व्यक्तिमत्त्व या देशामध्ये आले,' असेही सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले राज्यपाल कोश्यारी?
'आपल्या देशात गुरुची परंपरा आहे. ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते? समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते... चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते. गुरुचे महत्त्व मोठे आहे. समर्थ रामदासांच्या स्वप्नातील भारत साकारला पाहिजे.' असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
'संतांच्या मार्गावर चालल्यास भविष्य उज्ज्वल आहे. नोट आणि व्होटच्या पलिकडे जाऊन समाज आणि पुढील पिढी चांगली घडवली पाहिजे.' असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.