बदल्यांबाबत शासनाचा नवा आदेश

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)यांनी येत्या 30 जूनपर्यंत राज्य सरकारी सेवेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या प्रशासकीय बदल्यांना मनाई केली आहे. सन 2022-23 या आर्थिक वर्षात 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या ( Transfer )करण्यात येऊ नयेत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील आदेश जारी केले. या निर्णयाला राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची पार्श्वभूमी आहे.

सध्या मंत्रालयात बदल्यांचा हंगाम सुरु आहे. महसूल, गृह, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, वित्त, ग्रामविकास, गृहनिर्माण, परिवहन, कृषी आदी महत्वाच्या खात्यात मोक्याची जागा मिळविण्यासाठी अधिकार्‍यांची जोरदार लॉबिंग सुरु आहे. बदल्यांची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. मात्र, जून महिन्यात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत मतदानाची वेळ आली तर आमदारांची नाराजी नको म्हणून ठाकरे यांनी 30 जूनपर्यंत बदल्या न करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक पार पडल्यानंतर म्हणजे 30 जून नंतरच आता बदल्यांचे आदेश जारी होतील.

ङ्गमहाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध 2005फ या बदली कायद्यानुसार संबंधित एप्रिल, मे महिन्यात अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या नियतकालिक बदल्या करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकार्‍याला आहेत. 31 मे नंतर बदल्यांचे अधिकार वरती जातात. त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारी सध्या बदलीच्या प्रक्रियेत गुंतले आहेत.

सर्वसाधारणपणे 31 मेपर्यंत बदल्यांचा सोपस्कार पार पाडला जातो. मात्र, यावेळी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमुळे अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्या रेंगाळणार आहेत.

दरम्यान, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास अशी बदली मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने करावी, असे सामान्य प्रशासन विभागाने आपल्या आदेशात नमूद केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *