
नवी दिल्ली | New Delhi
राज्यासह देशात कोरोना विषाणूने ( Corona virus) पुन्हा आपले पाय पसरवायला सुरुवात केल्याने सरकारच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, याचे गांभीर्य लक्षात घेता सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांचे आरोग्यमंत्री ( Minister of Health) आणि अधिकारी यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेच्या पुढील धोरणांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार १० आणि ११ एप्रिल रोजी मॉक ड्रील होणार असल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी दिली आहे.
दरम्यान, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. सध्या राज्यात दररोज दीड लाख कोरोना टेस्ट केल्या जात आहेत. गुजरात, तामिळणाडू, महाराष्ट्र, केरळ अशा काही राज्यांमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत असल्याचे दिसून येते, त्यामुळे सदर बैठकीत प्रत्येक राज्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही (Guidelines) देण्यात आली आहेत.
तसेच महाराष्ट्रात सध्या चार हजारांच्या आसपास अॅक्टीव कोरोना रुग्ण असून, काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटीव्ह रेट हा १० टक्क्यांहून अधिक आहे. राज्यात १० टक्क्यांहून अधिक पॉझिटीव्ह रेट असलेल्या जिल्ह्यांची संख्या देखील वाढली आहे. राज्यात अजूनही अनेक ठिकाणी लसीकरण सुरू आहे. तर दोन्ही लसींचे (vaccines) डोस पुर्ण झाल्याचे प्रमाण ७५ टक्क्यांच्या वर पोहचले आहे.
कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी यंत्रणांची एकप्रकारे परीक्षा घेण्यासाठी येत्या १० आणि ११ एप्रिलला संपूर्ण देशात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. यामध्ये सक्रिय रुग्ण संख्येनुसार आरोग्य यंत्रणा किती प्रमाणात सज्ज आहे ते समजेल.
त्यानुसार आरोग्य यंत्रणा वाढवण्यात येईल. त्याबरोबरच ईमर्जंन्सी कोवीड प्रिपेडनेस पॅकेजचा (Emergency Covid Preparedness Package) निधी अद्याप संपलेला नाही. त्यामुळे हा निधी त्या-त्या ठिकाणी वापरून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात,अशा सूचनाही बैठकीत करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे.