नाशिक । प्रतिनिधी Nashik
नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वेबाबत ( Nashik-Pune Highspeed Railway )आता भूसंपादन (Land acquisition )प्रक्रिया लवकरात लवकर होणे आवश्यक आहे; त्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी गावागावात जाऊन शेतकर्यांशी संवाद साधायला पाहिजे, असे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरण डी (Collector Gangatharan d )यांनी दिले आहे. शनिवारी सुटीच्या दिवशीही जिल्हाधिकार्यांनी काही गावांमध्ये जाऊन प्रस्तावित रेल्वे मार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला आढावा घेत आहेत. भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करा, असे आदेश पवार यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील 23 गावांमधील जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहेत. जमिनीच्या वर्गवारीनुसार 52 ते 68 लाख रुपये मोबदला देण्यास जिल्हास्तरीय समितीने मान्यता दिली आहे. संबंधित गावांमधील तीन वर्षांच्या खरेदी-विक्री व्यवहारांचा अभ्यास करून हे दर निश्चित करण्यात आले आहेत.
परंतु, अजूनही शेतकर्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा प्रत्यय जिल्हा प्रशासनाला आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी अधिकार्यांची बैठक घेतली. गावात जाऊन प्रकल्पबाधितांशी चर्चा करण्याचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी आणि भूसंपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी सिन्नर तालुक्यातील काही गावांना भेटी देत पाहणी केली.