दिल्ली | Delhi
केंद्र सरकारने (Central Govt) घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेवर (Agneepath Scheme) बिहारमध्ये (Bihar) मोठा गदारोळ सुरू झाला आहे. या योजनेच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
बिहारमध्ये लष्करात भरती होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्यात आलं असून दगडफेक करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी बिहारमध्ये आंदोलन करण्यात येत असून अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक अडवण्यात आली आहे.
दरम्यान बिहारमधील छपरा जिल्ह्यात आंदोलक विद्यार्थी-युवकांनी छपरा जंक्शनजवळ एका पॅसेंजर ट्रेनला आग लावल्याची घटना घडली.
जहानाबाद आणि नवादामध्ये सैन्य भरतीसाठी तयारी करत असलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले. भारतीय लष्करातील कंत्राटी पद्धतीच्या नोकरीविरोधात नवादामधील विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप असल्याचे दिसत आहे.
काय आहे योजना?
अग्निपथ योजनेंतर्गत तरुणांना ४ वर्षांसाठी सैन्यात भरती केले जाईल. त्यामुळे एका बाजूला सैनिकांच्या कमतरतेची समस्या कमी होईल. त्याचबरोबर सैनिकांवर होणारा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे. करोना महामारीमुळे गेल्या २ वर्षांपासून सैन्यात भरती थांबली आहे. पूर्वी जिथे नवीन सैनिकांना ९ महिन्यांचे प्रशिक्षण घ्यावे लागत होते आणि वेतनश्रेणीही कमी होती. आता तिथे फक्त ६ महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. लष्करातील पहिले निवृत्तीचे वय सुमारे ४० वर्षे होते. त्याचबरोबर आता नव्या नियमांनुसार पहिली ४ वर्षे सैनिकांची भरती होणार आहे. आता सैनिकांना कमी पगार मिळतो, पण नवीन नियमानुसार त्यांना सुमारे ३० हजार रुपये मिळतील, असे सांगण्यात येत आहे.
या योजनेला का होतोय विरोध?
राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशासाठी या योजनेचा फायदा होईल. तसेच शारीरिक तंदुरुस्ती, कौशल्य विकास, मानसिक विकास, टीम बिल्डिंग आणि डिसिप्लीन अशा विविध गोष्टी अग्निवीरांना या चार वर्षात आत्मसात करता येतील, असे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र, चार वर्षांची लष्करी सेवा संपल्यानंतर या तरुणांचे काय होणार, 22 ते 25 वयोगटातील हे तरुण कोणत्याही अतिरिक्त पदवीशिवाय आपले भविष्य कसे घडवणार? नियमित सैनिक 15 वर्षांच्या सेवेनंतर परत येतात, तेव्हा बहुतेकांना बँकेच्या गार्ड किंवा सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळते, पण या कंत्राटी भरतीमुळे तरुणांचे भवितव्य काय? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला.