(छायाचित्र : सतीश देवगिरे)
काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
जून महिना आणि पाऊस सुरु झाला म्हणजे विठ्ठल वाघ यांच्या या गीताचे वर्णन सर्वत्र दिसू लागते. आता मॉन्सून दाखल झाल्यामुळे सर्वत्र पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी कापसाची लागवड झाली आहे. बागयतदार शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली आहे.
राज्यात खरीप हंगाम जून ते सप्टेंबर असतो. उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी या हंगामाच्या तयारीत व्यस्त आहे. कोरोनाचे सावट असले तरी आपली शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. सध्या सर्वत्र असलेल्या कोरोनाच्या साथीमुळे शेतीच्या कामांसाठी मजुर मिळेनासे झाल्याने शेतकरी कुटुंबातील लहानथोर सर्वच शेतात राबतांना दिसतात.
नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात द्राक्षबागांची एप्रिल छाटणी होऊन सबकेनची कामे आटोक्यात आली आहेत. काही ठिकाणी उन्हाळी भुईमूग बहरलेला दिसतो. नाशिक तालुका पूर्व भागातील बहुतेक शेतकरी मोठ्या प्रमाणात द्राक्षाची लागवड करतात.
सोनाका, सुधाकर, थॉमसन, शरदसिडलेस, एस.एस.एन. या प्रकारचे द्राक्षाचे वाण घेतले जातात. शेतकऱ्यांची पावसाळापूर्वीची शेतीची मशागत करून खरीप हंगामाची तयारी जोरदार सुरू झाली आहे.
गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाचे वातावरण तयार होऊन लागले आहे. त्यामुळे शेतकरी आता खरीप हंगामाची तयारी करू लागला आहे. उन्हाळी कांद्याची काढणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतीची नागरणी बैलजोडीने किंवा ट्रॅक्टरद्वारे शेतीची नागरणी करतांना दिसून येते आहे.नागरणी झाल्यावर त्याची वखरणी करून त्यात शेणखत मिळवण्याच्या कामे करीत आहे. पुन्हा जमीन बैलजोडीच्या साह्याने किंवा ट्रॅक्टरने बेले पाडण्याचे कामे सुरू आहेत. चालू वर्षी शेतीत पिकवलेल्या कोणत्याही मालाला भाव नसल्याने आता खरिपात कोणते पीक घ्यावे याची चिंता शेतकऱ्याला सतावत आहे.