
नाशिक | Nashik
कांद्याचे (onion) भाव सातत्याने घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) चिंताग्रस्त झाला आहे. लाखो रुपये खर्च करून बाजारात कांद्याला प्रति क्विंटल अवघे ३०० ते ४०० रुपये मिळतात. त्यामुळे कांदा बाजारात (Market) नेण्यासाठी आणखी खर्च करण्याऐवजी येवला तालुक्यातील (Yeola Taluka) मातुलठाण येथील एका शेतकऱ्याने आज होळीच्या दिवशी शेतात कांद्यांची होळी (Holi) करून कांदा पेटवून दिला....
याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा डोंगरे असे या कांदा उत्पादक शेतकऱ्याचे नाव असून कांद्याच्या प्रश्नाकडे सरकारचे (Government) लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज होळीच्या दिवशी सरकारविरोधात शिमगा केला. कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्याने डोंगरे यांनी आपल्या शेतात दीड एकरवर उभे असलेले कांद्याचे पीक सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करत होळी करून पेटवून (Burning) दिले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत अगदी पोटच्या मुलाप्रमाणे पिकाची (Crop) काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांवर स्वतच्या हातानेच जड अंतःकरणाने कांद्याचे पीक उपटून त्याची होळी करण्याची वेळ आली आहे. बाजारात भावच नसल्याने शेतातील कांदा बाजारात नेऊन उपयोग काय? त्यापेक्षा तो शेतातच जाळलेला बरा,अशी मनःस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे डोंगरे कुटुंबातील महिला व लहान मुलांनी पाणावलेल्या डोळ्यांनी कांद्याला अग्निडाग दिला.