
गडचिरोली | Gadchiroli
दोन आठवड्यांपूर्वी नाशिक येथील मेळाव्यात भाजपच्या (BJP) ज्येष्ठ नेत्यांनी ‘महाविजय संकल्प' (Mahavijay Sankalp) व्यक्त केला, त्यानंतर देशाचे गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनीही महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणू, असा दावा केला आहे...
भाजपच्या नेत्यांच्या या दाव्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी शंका उत्पन्न केली असून त्यांनी भाजपच्या या दाव्याचा संबंध थेट ईव्हीएम मशीनच्या सेटिंगपर्यंत जोडला आहे. भाजपचे दिग्गज नेते अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्रात 48 जागा जिंकून आणू असा दावा कोणत्या आधारावर करत आहेत. त्यांच्या या दाव्यामागे नक्की काहीतरी षडयंत्र आहे.
त्याबरोबरच देशात मतदानासाठी वापरण्यात येणारे ‘ईव्हीएम मशीन’ (EVM machine) सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळेच ते एवढे खात्रीशीर दावे करू शकतात, असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी केला आहे.
चंद्रकांत खैरे हे राज्याच्या राजकारणाबरोबरच, देशातील राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत, तत्कालीन औरंगाबाद (Aurangabad) येथून त्यांनी राजकारणाची मोठी कारकीर्द गाजवली आहे. देशाच्या संसदेत ते दीर्घकाळ सदस्य राहिले आहेत अशा ज्येष्ठ नेत्याने थेट निवडणुकीतील (Election) मतदान यंत्रावर असा गंभीर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
‘ईव्हीएम मशीन’ सेट केले जात असल्याने ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवा, अशी माझी प्रमुख मागणी असल्याचेही खैरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने राज्यभरात शिवगर्जना (Shivgarjana) अभियानाला सुरुवात केली आहे.
याअंतर्गत ठाकरे गटाचे विविध नेते-कार्यकर्ते राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन शिवसैनिकांचे मेळावे घेत आहेत. चंद्रकांत खैरे यांचा शिवगर्जना यात्रेतील दौरा गडचिरोलीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारबरोबरच शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.