
मुंबई | Mumbai
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त (Shri Krishna Janmashtami) देशभरासह राज्यातील मंदिरांमध्ये काल मध्यरात्रीपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने भगवान श्रीकृष्णांच्या लाखो मंदिरांमध्ये (Temple) भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. रांचीमध्ये (Ranchi) जन्मोत्सवाच्या उत्सवानंतर मध्यरात्री दहीहंडी (Dahihandi) फोडण्यात आली. तर मथुरेत देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष करण्यात आला. याशिवाय ठिकठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे...
तसेच मुंबईसह देशभरातील इस्कॉन मंदिरांमध्ये देखील भक्तीचा सागर दिसून येत आहे. तर राज्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रात्री बारा वाजता मुंबईतील अनेक भागात मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तरुणांनी (Youth) अनेक थर रचत दहीहंडी फोडली आणि आनंद लुटला. मुंबईतील दादर, नायगाव, वरळी, लोअर परळ आणि इतर परिसरात मोठ्या उत्साहाने दहीहंडी फोडून कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. त्यानंतर आज देखील मुंबई ठाण्यासह इतर भागांत ठिकठिकाणी दहीहंडीच्या थरांचा थरार पाहायला मिळणार आहे.
तर मुंबईत (Mumbai) आज भाजपच्या (BJP) वतीने ४०० दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली आहे. तर वरळीत परिवर्तनाची दहीहंडी उभारली आहे. याशिवाय ठाण्यात मनसेच्या (MNS) अविनाश जाधव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीसाठी जय जवान गोविंदा मंडळ आणि शिवसाई गोविंदा पथक ९ थर रचणार आहेत. याठिकाणी मनसेने १० थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचे पारितोषिक जाहीर केले आहे.