राज्यात वाढणाऱ्या कोरोना (corona)रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचा(omicron variant) भारतात शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने सरकारने कठोर पाऊलं उचलण्याचा विचार सुरु आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर (vijay wadettiwar)यांनी प्रतिक्रिया दिली.
विजय वडेट्टीवर म्हणाले की, मुलांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील एकही मुलगा सुटणार नाही, अशी मोहीम आम्ही हाती घेतली आहे. त्यामुळे लसीकरण युद्धपातळीवर केले जाईल. शाळा बंद करण्याची वेळ येऊ शकते. तसा निर्णय ठाकरे घेऊ शकतात.कोरोना संक्रमण रोखण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही निर्बंध लावले जाऊ शकतात असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
राज्यात काही ठिकाणी कन्टेन्मेंट झोन करुन तिथे प्रवेश बंदी केली जाईल. गर्दी होणार नाही त्याची दक्षता घेण्यात येईल. रेल्वेत जी गर्दी होतेय त्यावरही मुख्यमंत्री गंभीर आहेत. कॅबिनेट आणि टास्कफोर्सच्या बैठकीत यावर चर्चा होईल. निर्णय होणे अपेक्षित आहे अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.