नवी दिल्ली
करोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या जगाला सध्या फक्त प्रभावी लशीच्या आगमनाची चाहूल आहे. जगात १५० हून अधिक कोरोनावरील लशींची सध्या जगभरात संशोधन आणि चाचणी सुरु आहे. कोणाला केव्हा लस मिळणार याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (health minister dr harsh vardhan) यांनी रविवारी दिली.
जगात अजून एकाही लशीला मान्यता मिळाली नाहीये. फक्त रशियाने आपल्या स्फुटनिक व्ही या लशीला ऑगस्ट महिन्यात मान्यता दिली आहे. मात्र या लशीची मोठ्या प्रमाणावर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. भारतातही करोनावरील तीन लशींच्या निर्मितीची आणि चाचणीची प्रक्रिया सुरु आहे. यामुळे प्रत्येक भारतीयास लस केव्हा मिळणार याची माहिती अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन दिली. जुलै २०२१ पर्यंत भारतातील कोट्यवधी लोकांपर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले भारतात ५०० दशलक्ष डोस देण्याची सरकारची योजना आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार अाहे. कोणत्या लोकांना सर्वात आधी लस दिली जावी, याबाबत राज्यांकडूनही ऑक्टोबरअखेरपर्यंत सूचना मागवल्या असल्याचे त्यांनी सांगितले.