देवळाली कॅम्प । वार्ताहर
राज्य शासनाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी देवळालीच्या आ. सरोज आहिरे यांनी वीज प्रश्नाबाबत बोलताना अभ्यासपूर्ण माहिती सादर करीत एकलहरे येथील 660 मेगा वॅटचा प्रकल्प व युवकांना प्रशिक्षण याबाबत ऊर्जामंत्र्यांना साकडे घालताना हा प्रकल्प देवळाली मतदारसंघासाठी जीवन मरणाचा प्रश्न असल्याने तो पूर्ण करणारच, असा खणखणीत आवाज विधानसभेत उठविला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसर्या दिवशी पहिला प्रश्न आ. आहिरे यांनी स्वतंत्ररित्या सभागृहाच्या पटलावर मांडला. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पाबाबत 660 मेगावॅट प्रश्न अतिशय महत्त्वाचा असल्याने आ. आहिरे आक्रमक होऊन या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील विजेचा वापर कमी होण्यासाठी पर्यावरणपुरक सौर ऊर्जाचे अधिकाधिक वापर होण्यासाठी शासकिय इमारती तसेच कारखाने, हाँटेल इत्यादींवर सौर ऊर्जेचे पॅनेल बसविले जात आहेत.
सदर प्रकरणी सौर उर्जवर निर्माण होणारी वीज व त्या व्यतिरीक्त त्या त्या संबंधीत आस्पापनांना लागणारी विज वगळता वापरात शिल्लक असलेल्या विजेबाबत शासनाचे नेमके धोरण काय, ते स्पष्ट करावे. तसेच एकलहरे औष्णीक विज केंद्राच्या स्थापनेवेळी पंचक्रोशीतील स्थानिक शेतकर्यांनी गोदावरी नदीकाठच्या आपल्या काळ्या मातीच्या सुपिक जमीनी या प्रकल्पाकरीता शासनास दिल्या. परंतु सध्या एकलहरे प्रकल्पाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तत्कालीन सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनी सदर प्रकल्पाला भेट देवून रिप्लेसमेंट युनिट म्हणून 660 मेगा वॉटचा प्रकल्प सुरू करणेवाबत आश्वासित केले होते.
परंतु प्रकल्प सुरू करण्याबाबत आजपर्यंत ऊर्जा विभाग व शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाल्याची आढळून आली नाही. याबाबत शासनाची नेमकी भूमिका स्पष्ट करावी. तसेच सदर एकलहरे औष्णीक विज प्रकल्पाकरीता ज्या शेतकर्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले मिळाले असून कोविड-19 मुळे प्रशिक्षणार्थीची बॅच आज रोजी सुरू करण्यात आली नाही, याबाबत प्रशिक्षणार्थींची बॅच सुरू करण्याबाबतची शासनाची भूमिका काय. हाही प्रश्न यावेळी आ. आहिरे यांनी सभागृहात उपस्थित केला. या विषयावर ऊर्जामंत्र्यांनी शासनाची भूमिका सकारात्मक असून या प्रकल्पाबाबत लवकरच चांगला निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.
संच क्रमांक 5 सुरू
नाशिक औष्णिक विद्युत केंद्र एकलहरे येथील गेल्या एक वर्षापासून बंद असलेला संच क्रमांक 5 अखेर सुरू करण्यात आला आहे. वीजेची मागणी व उजा मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्याने संच सुरू झाला आहे. परिसरात नागरिक व सेवकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. एकलहरे येथील प्रस्तावित 660 मेगा वट प्रकल्प व्हावा, अशी मागणी कायम आहे. त्यासाठी येथील लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहे. मात्र करोना काळात येथील सर्वच संच बंद झाले होते. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती.
परिसरातील नागरिकांनामध्ये नाराजीचा सुर होता. काही दिवसांपुर्वी करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर एकलहरे येथील संच क्रमांक 4 सुरू करण्यात आला होता. गेल्या 90 दिवसांपासून हा संच सुरू आहे. मात्र संच 5 गेल्या वर्षांपासून बंद होता. या संचावर अवलंबून असलेले कामगार व लघुउद्योग बंद होते. त्यामुळे मोठे संकट उभे राहीले होते. संच क्रमांक 5 सुरू होण्यासाठी लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता.